Friday, August 14, 2009

' गती - विकॄती '

रक्त जरी सर्व शरीराला व्यापून असले व रात्रंदिवस गतिशील असले तरी ते रक्तवाहिन्यांमध्ये बंदिस्त असते. मेंदू, हॄदय, मूत्रपिंड वगैरे मोठे अवयव असोत किंवा करंगळीचे टोक असो, सर्व दूर रक्तवाहिन्यांमधून रक्त फिरत असते. यालाच रक्ताभिसरण क्रिया म्हणतात व त्यातूनच रक्तदाब तयार होत असतो. अर्थातच रक्तदाब प्रत्येक व्यक्तीला असतोच कारण त्याखेरीज रक्ताभिसरण होऊच शकणार नाही.

निरोगी अवस्थेतही रक्तदाब प्रसंगानुरुप थोडा फार कमी जस्ती होत असतॉ. भरभर चालण्याने, पळण्याने जशी श्वासाची गती वाढते तेसेच श्रम झाल्यास रक्तदाब थोडा वाढतो पण विश्रांती घेतल्यावर आपण प्राकॄतावस्थेत येतॉ.

आयुर्वेदात रक्तदाब या नावाने वेगळा असा व्याधी सांगितलेला आढळत नाही. मात्र शरीरातील रस, रक्त धातूंच्या गतीतील विकॄतीमुळे होऊ शकणार्‍या संभाव्य विकारांपैकी ह एक विकार होय. ही 'गती - विकॄती' रक्ताभिसरणास कारणीभूत असणार्‍या हॄदय किंवा रक्तवहिन्यातील बिघाडामुळे होउ शकते, शरीरातील अतिरीक्त क्लेदांश मूत्रामार्फत वाहून नेणार्‍या किडनीचे काम व्यवस्थित होत नसल्याने उदभवू शकते किंवा 'चिन्त्यानां चाति चिन्तनात्' या न्यायानुसार अति मानसिक ताणामुळे अर्थातच मेंदूच्या अति श्रमानेही होऊ शकते.

तसेच रक्तदाब वाढला असता किंवा कमी झाला असताही शरीर, मनावर दिसणारी लक्ष्णे वात, पित्त दोष वाढल्याची व कफ दोष कमी झाल्याची असतात. म्हणून आयुर्वेदानुसार रक्तदाबावर उपचार करताना त्रिदोष संतुलनाबरोबरच, रक्तदाबाचा त्रास होण्याचे मूळ कारण काय आहे याचा विचार केला जातो व त्यानुसार केलेल्या उपचारांनी रक्तदाबावर यशस्वी चिकित्सा करता येऊ शकते.

रक्तदाबाची सामान्य कारणे अशी सांगता येतील -
  • पचायला जड अशा मेदस्वी पदार्थांचे अती सेवन उदा. तेल, चीज, मांसाहार
  • खाण्यापिण्यातील व वागण्यातील अनियमितता, एकंदर जीवनशैलीतील अनिर्बंधता व बेशिस्तपणा
  • व्यायामाचा अभाव
  • अतिस्थूलता
  • अतिरिक्त धूम्रपान व मद्यपान
  • अतिचिंता तसेच कामामध्ये अति व्यस्तता

याखेरीज किडनीचे कर्य नीट न होणे, अनेक वर्षांचा मधूमेह, रक्तवाहिन्या कठीण व जाड होणे, स्त्रियांच्या बाबतीत गर्भारपणात रक्तदाब वाढल्याचा इतिहाअस असणे तसेच गर्भाशय काढून टाकणे ईत्यादींमुळे रक्तदाब वाढु शकतॉ.

मुळात रक्तदाबाचा विकार मागे लागूच नये म्हणून खबरदारी घ्यायला हवी. हा विकार ओळखणे खरे पहाता अतिशय सोपे आहे. र्क्तदाब मोजणे हे अक्षरशः दोन मिनिटांचे काम असते. आजकाल तर घरच्या घरी सुद्धा सध्या यंत्राच्या साहय्याने रक्तदाब मोजता येणे शक्य आहे. या विकाराची अगदी सुरवातीला फार काही लक्षणे दिसत नाहीत. पण जेवढ्या लवकर निदान होईल तेवढ्या चांगल्या प्रकारे उपाययोजना करता येत असल्याने वयाच्या पस्तीशी नंतर वर्ष-सहा महिन्यांनी एकदा तरी रक्तदाब मोजून घ्यावा. घरी रक्तदाबाची किंवा हॄदयरोगाची आनुवंशिकता असणार्‍यानी तर अधिकच दक्ष राहावे. वर सांगितलेली कारणे लागू होत असणार्‍यांनीही अधिक काळजी घ्यावी.


रक्तदाब वाढल्याची लक्षणे.

  • डोके दुखणे, चक्कर येणे, डोके जड वाटणे.
  • अशक्तपणा वाटणे, गळून गेल्यासारखे वाटणे.
  • अवेळी डोळ्यांवर झापड येणे पण योग्य वेळी झोप न येणे
  • छातीत धडधडणे
  • भरभर चालताना किंवा जिने चढताना दम लागणे
  • छातीत दुखणे
  • अकारण चिडचिड होणे

सुरवातीला ही लक्षणे सतत दिसत नाहीत,काही वेळाने अपोआप नाहीशी होतात. अशावेळेला लक्षणे दिसत असताना आवर्जून तपासणी करून घेतली तरच उच्च रक्तदाबाचे निदान होऊ शकते.

कैक वेळेला रक्तदाब वाढला तरी व्यक्तीला कहीही लक्षणे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत बहुधा त्रास होत नाही म्हणून तपासणी केली जात नाही. या दोन्ही गोष्टी आरोग्याला घातक होत.

रक्तदाबाचा त्रास सुरू झाला की तो शेवट्पर्यंत राहणार, आयुष्यभर औषधे घ्यावी लागणार हे मात्र प्रत्येक केस मध्ये लागू होत नाही. वेळीच निदान होणे, मूळ कारण लक्षात घेऊन ते टाळायची तयारी असणे व रस-रक्ताच्या गती-विकॄतीवर योग्य उपचार सुरू करणे या गोष्टींनी रक्तदाब बराही होऊ शकतॉ. अर्थातच जितक्या लवकर, नियमित व योग्य उपचार केले जातील तितका लवकर व चांगल उपयोग होताना दिसतो.

रक्तदाब असणार्‍यांनी खालील गोष्टींवर लक्ष ठेवावे.

  • तळलेले तेलकट पदार्थ शक्यतो टाळावेत.
  • चीज, श्रीखंड, मांसाहार, अंडी, वाटाणा, पावटा, चवळी, हरबरा इत्यादी पचायला जड असणार्‍या वातवर्धक गोष्टी टाळाव्यात.
  • कच्चे मीठ किंवा वरून मीठ घ्यायची सवय सोडावी.
  • वजन प्रमाणापेक्षा अधिक वाढलेले असल्यास योग्य उपायांनी हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करावा.
  • रात्री उशिरा जेवायची सवय मोडावी.
  • रोज ३०-३५ मिनिटे चालायला जावे, योगासने करावीत. मात्र शरीराला थकवणारे व्यायामप्रकार टाळावेत.
  • रात्री लवकर झोपावे व प्रकॄतीनिरूप किमान ६ ते ७ तास शांत झोप लागेल याकडे लक्ष ठेवावे.
    दिवसभराच्या कामाचा ताण किंवा नातेसंबंधातीलतणावाचा स्वतःवर कमीतकमी परीणाम होईल यासाठी प्रयत्नरत राहावे, झोपण्यापूर्वी १० मिनिटे डोळे बंद करून शांत बसणे, आपल्याला आवडत्या छंदात मन गुंतवणे, मनःशांती देणारे स्वास्थ्यसंगीत ऐकणे, ध्यान करणे अशासारखा जमेल तो उपाय करावा.
  • काम करताना थकवा जाणवावयास सुरवात झाल्यास वेळीच विश्रांती घ्यावी. शरीर व मन दोहोंवर जबरदस्ती करू नये.
  • मुळात रक्तदाब वात-पित्त असंतुलनातून तयार होत असल्याने दूध, घरी बनवलेले साजूक तूप, साधा, सात्त्विक पण चौरस आहार ठेवावा. वजन वा कोलेस्तेरॉल वाढण्याच्या भीतीने हॄदय, मेंदूला पोषक व वात-पित्तशामक आहार पदार्थ अकारण बंद करू नयेत. मात्र चुकीच्या पद्धतीने बनवलेले तूप, बाजारातील लोणी वगैरे गोष्टी निश्चितच टाळाव्यात.
  • रक्ताभिसरण वाढवण्यासाठी, रसरक्तधातूंच्या गतीचे नियमन करण्यासाठी व शॠरातील रक्तवाहिन्यांतील काठीण्य नष्ट होण्यासाठी 'अभ्यंग' करणे हा एक श्रेष्ठ व सहज करता येण्यासारखा उपाय आहे. अभ्यंगासाठी वापरलेले तेल आयुर्वेदिक पद्धतीने शास्त्रशुद्धरीत्या तयार केलेले असावे. अशा शास्त्रशुद्ध अभ्यंगाची विशेषता अशी की याने कमी झालेला रक्तदाब पुन्हा पूर्ववत होऊ शकतो तसेच वाढलेला रक्तदाब कमी होऊ शकतो.
  • आयुर्वेदशास्त्राने सांगितलेले त्रिदोष संतुलन करणारे स्नेहन स्वेदनपूर्वक पंचकर्म शास्त्रशुद्ध पद्धतीने करून घ्यावे. विशेषतः वेरेचन, बस्ती या उपक्रमांचा रक्तदाबात उत्कॄष्ट फायदा होताना दिसतो. बरोबरीने मूळ कारणानुरूप शिरोधारा, शिरोबस्ती, कर्णपूरण, पिंडस्वेदन वगैरे उअपचार उत्तम फायदा करणारे आहेत.
  • शवासन, योगनिद्रा या योगातल्या क्रियांचा वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी खुप उपयोग होतो. आत्मसंतुलन केंद्रात असंख्य रुग्णांनी अनुभव घेतल्यानंतर युनिव्हर्सिटी संलग्न संशोधनातून योगनिद्रा संगिताचा उपयोग सिद्ध झालेला आहे. तेव्हा अशा योगनिद्रा संगीताचाही रक्तदाब नियंत्रणासाठी उपयोग करता येईल.

रक्तदाब कमी करणार्‍या इतर औषधांच्या बरोबरीने मुळापसूनच रक्तदाब बरा करू शकणारी आयुर्वेदिक औषधेही सुरू करावीत म्हणजे हळूहळू त्रिदोषसंतुलन प्रस्थापित झाले, रसरक्तधातूतील गती-विकॄति नाहीशी झाली व बरोबरीने आहारविहारातील अनुशासन कायम ठेवले की रक्तदाबापासून मुक्ती मिळू शकते.

रक्तदाबाचे एक विशिष्ट असे औषध नसते तर प्रकॄती, वय, रक्तदाबाचा त्रास होण्याचे कारण वगैरे गोष्टींचा विचार करून योग्य औषध निवदावे लागते. किडनीचे काम व्यवस्थित होत नसल्यास गोमूत्र, पुनर्नवासव, गोक्षुरादी चूर्ण, चंद्रप्रभा वगैरे औषधांचा वापर करावा लागतो. हॄदयामुळे, रक्तवाहिन्यांमधील काठिण्यामुळे रक्तदाबाचा त्रास होत असल्यास बॄहत्वातचिंतामणी, सुवर्णभस्म, अर्जुनारिष्ट, सुवर्णसूतशेखर, वगैरे औषधे प्रकॄतीनिरूप योजावी लागतात. तर रक्तदाबाचे मूळ कारण मेंदूशी संबंधित असल्यास जटामांसी, ब्राह्मी, ब्राह्मीघॄत, वगैरे औषधांचा उत्तम उपयोग होताना दिसतो.

थोडक्यात सांगायचे झाले तर रक्तदाबाचा विकार मुळात होऊ नये यासाठी अगोदरच काळजी घ्यावी. पण तरीही रक्तदाब झालाच तर रक्तदाब नियंत्रित ठेवण्याबरोबरच मूळातून बरा होण्यासाठी योग्य उपचार करावेत. योग्य उपचारांना संतुलित आहार, निर्व्यसनी जीवन पद्धती, व्यायाम, चालणे, योग, संगीत व मानसिक स्वास्थ्य यांची जोड द्यावी.



- डॉ. श्री बालाजी तांबे

2 comments:

  1. अतिशय चांगली माहिती मिळाली धन्यवाद....

    ReplyDelete